Tweet

Saturday 13 August 2011

पवनेचे पाणी पेटले:

River Water For Drinking
विकास झालाच पाहिजे. याबद्दल दुमत असू शकत नाही. परंतु, विकासाकरिता जमीन, पाणी, वीज, रस्ते वगैरेंची नितांत आवश्यकता आहे. ही आवश्यकता पुरी करण्याकरिता कोणाला ना कोणाला त्याग करावयास पाहिजे. बहुजन हित पाहता 2-4 जणानी त्याग केला व 2-4 हजारांना फायदा होत असेल तर त्या दोन-चार जणानी त्याग करणे इष्ट आहे. त्याच बरोबर 2-4 हजारांनी त्या 2-4 जणांची काळजी घेणे हेही ओघाने येतेच. 2-4 हजारांनी ही बांधिलकी लक्षात घेऊन जर वर्तन केले तर 2-4 जण नक्कीच त्याग करण्यास तयार होतील व त्याग करतीलच. भारतात हे नक्कीच शक्य आहे.
शेतकऱ्यांना शेतजमीन ही आई वाटते. भारतीय आईकरिता काहीही करण्यास तयार असतात.  आपण देशाला भारतमाता म्हणतो. देशावर परकीय आक्रमण झाल्यास सर्व वयोगटातील जनता काहीही त्याग करण्यास एका पायावर तयार असते. त्यामुळेच आतापर्यंत भारत स्वतःचे संरक्षण करु शकला. पिंपरीचिंचवडमधील रहिवाशांना पिण्याचे प्रदूषणरहित पाणी मिळण्याकरिता बंद नलिकेतून पाणीपुरवठा करण्यात शेतकरी आईसमान जमीनही देण्याचा त्याग करतील. परंतु, त्यांच्या त्यागाला पिंपरीचिंचवडमधील रहिवाशांकडुन प्रतिसाद काय आहे?
पिंपरीचिंचवडचे रहिवाशी बांधिलकी मानण्यास तयार आहेत काय? शेतकऱ्यांचा त्यागाला काय प्रतिसाद देणार? रस्ता रुंद करणयाकरिता अथवा नागरिकांकरिता स्वच्छतागृहे बांधण्याकरिता पिंपरीचिंचवडमधील रहिवाशी खुशीने जागा देतात काय? अतिक्रमणे करणे बंद करतील काय? झालेली अतिक्रमणे काढून टाकतील काय? अशा कित्येक प्रश्रांची उत्तरे नाही म्हणूनच येतील. त्यांना फक्त शेतकऱ्यांनी त्याग करावा आम्ही मात्र काहीही त्याग करू नये असेच वाटते. हा सगळा स्वार्थाचा खेळ आहे. महाराष्ट्रातील साधुसंतानी कितीही उपदेश केला असला तरी त्याची अंमलबजावणी मी सोडून इतर सर्वांनी करावी अशीच आपणा सर्वांची इच्छा असते. अशा नागरिकानी शेतकऱ्यांकडून त्यागाची अपेक्षा का करावी?
पिंपरीचिंचवडमधील रहिवाशी त्यागाला तयार झाले तर हा प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो. त्याकरिता काय केले पाहिजे हे पाहण्याकरिता येथे टिचकी मारा. थोडक्यात काय केले पाहिजे हे खाली दिले आहे.
1.       वाहिनी ज्या क्षेत्रातून जाते त्या क्षेत्राचे सर्वेक्षण करावे.
2.      वाहिनीचा मार्ग शक्यतो ओसाड जमिनीतून जावा. त्याकरिता वाहिनीची लांबी वाढवावी लागली तर तेही शक्य तितके करावे. लांबी वाढविणे अशक्य असेल तर त्याला इलाज नाही.
3.      वाहिनी 1-2 मिटर जमीनीखालून घालावी.
4.     वाहिनीच्या आजूबाजूच्या (वाहिनीपासून समजा 3 किलोमिटर अंतरातील) सर्व गांवांना 2011 च्या जननगणणेच्या 3-5 पट जनसंख्या गृहित धरुन तहहयात मोफत पाणी पुरवावे. त्याकरिता एक दिवसाचे पाणी साठविता येईल अशा क्षमतेचा जमीनीच्या पातळीवर मोफत टाकी बांधून द्यावी.
5.      वाहिनीच्या दोन्ही बाजूला पूर्ण लांबीचा पक्का रस्ता बांधूल द्यावा जेणेकरुन शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्न सुटेल.
6.      किती रुंदीची जागा लागेल हे ठरवताना वाहिनीला लागणारी जागा तसेंच रस्त्याकरिता जागा विचारात घ्यावी.
7.     जमीन घेण्याचा विचार करताना लागणाऱ्या जागेच्या 20 पट जागेचा विचार करावा. त्या जागेतील शेतकऱ्याना 5 टक्के जागा कमी करून बाकी जागा त्या प्रमाणात व सध्याच्या अनुक्रमाने परत द्यावी. हे करण्याकरिता येणारा सर्व खर्च पिंपरीचिंचवडमधील रहिवाशांनी करावा.

या प्रकारे हा प्रश्न सामोपचाराने सुटु शकतो. आपल्या प्रतिक्रिया, इतर उपाय वगैरे आपण मांडले तर प्रश्न सोडविण्यात मदतच होईल. प्रश्न विचारण्यापेक्षा समाधान शोधण्यात लक्ष केंद्रित करावे अशी विनंती आहे.

No comments:

Popular Posts